गारगोटी : व्हनगुत्ती (ता. भुदरगड) येथील पती-पत्नीने दोन व्यक्तींकडून आर्थिक फसवणूक झाल्यावरून गळफास घेऊन आत्महत्या केली. राहुल राजाराम परीट (वय २३) व त्यांची पत्नी अनुष्का (२१) अशी त्यांची नावे आहेत. इस्पूर्ली (ता. करवीर) येथे गुरुवारी दुपारी ही घटना उघडकीस आली.
याप्रकरणी इस्पूर्ली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. इस्पूर्लीत एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती मिळताच नातेवाईक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक फौजदार नलवडे यांनी पंचनामा केला. चुलते दत्तात्रय परीट यांनी याबाबतची वर्दी दिली.
सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : आत्महत्या करण्यापूर्वी राहुल याने मित्र मंडळींच्या व्हॉटस् ॲपवर एक मोठा संदेश पाठविला. त्यात म्हटले आहे की, राहुल राजाराम पाटील महावितरणमध्ये काम करीत होता. त्यांची नियुक्ती कागल तालुक्यातील एका गावात होती.
त्याने तेथील १०९ ग्राहकांची वीज बिल भरणा रक्कम सुमारे एक लाख ४५ हजार ७६० जमा केली होती. ही रक्कम भरण्यासाठी एका सहकाऱ्याकडे दिली होती. त्याने ती रक्कम न भरता वडिलांच्या उपचारासाठी वापरली. दरम्यान, त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्याने याबाबत कोणालाही माहिती देऊ नको, मी तुला पैसे परत करतो, असे सांगितले होते.
सतत पैसे मागितल्यानंतर यातील फक्त तीस हजार रुपये इतकीच रक्कम परत केली. कागल तालुक्यातील दुसऱ्या एका व्यक्तीने कर्ज मिळवून देतो म्हणून माझ्याकडून एक लाख वीस हजार रुपये रोख रक्कम घेतली. यानंतर कर्ज प्रकरणाबाबत त्याच्याकडे सतत पाठपुरावा केला असता त्याने टाळाटाळ करून फसवणूक केली.