नवी दिल्ली : केंद्र सरकारची लोकप्रिय योजना असलेल्या उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मोठी बातमी दिली आहे. मोदी मंत्रिमंडळाने बुधवारी ४ ऑक्टोबर रोजी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदान २०० रुपयांवरून ३०० रुपयांपर्यंत वाढवले आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने एलपीजीच्या दरात २०० रुपयांची कपात करण्याची घोषणा मंत्रिमंडळाने केली होती. तर आज उज्ज्वला लाभार्थीची रक्कम २०० रुपयांवरून ३०० रुपये करण्यात आली आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय जाहीर केले. रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने आम्ही एलपीजी सिलिंडर २०० रुपयांनी कमी केले. त्यानंतर LPG सिलिंडरची किंमत ११०० रुपयांवरून ९०० रुपयांपर्यंत कमी झाली होती तर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ७०० रुपयांना गॅस उपलब्ध झाला. आता या उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ३०० रुपये अनुदान म्हणतेच सबसिडी मिळणार आहे. म्हणजे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता ६०० रुपयांना गॅस सिलिंडर उपलब्ध होणार आहे.
घरगुती LPG दरात केलेली मोठी कपात :
सरकारच्या या निर्णयाचा थेट फायदा ३३ कोटी गॅस सिलिंडर ग्राहकांना तर होईलच, पण यापूर्वी ३० ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने घरगुती एलपीजी सिलिंडरवर २०० रुपयांच्या सबसिडीला मंजुरी दिली होती. तर मागील घोषणेमध्ये सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सध्याच्या अनुदानात २०० रुपयांची वाढ केली होती. ज्यामुळे एकूण अनुदान प्रति सिलिंडर ४०० रुपयांवर झाली होती. दरम्यान, २०२४ या आर्थिक वर्षात सरकार ७,६८० कोटी रुपयांचा अतिरिक्त एलपीजी सबसिडीचा भार उचलेल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
PMUY योजनेत सिलिंडरची किंमत किती असेल?
उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना सध्या १४.२ किलो म्हणजे घरगुती एलपीजी सिलिंडरसाठी ७०३ रुपये मोजावे लागत आहेत, तर त्याची बाजारातील किंमत ९०३ रुपये आहे. अशा स्थितीत आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नव्या निर्णयानंतर योजनेतील लाभार्थ्यांना ६०३ रुपयांना LPG गॅस सिलिंडर उपलब्ध होईल.
जळाऊ लाकूड, कोळसा, गाईच्या गोबर इत्यादी जुन्या व पारंपारिक स्वयंपाकाच्या इंधनाचे अनेक तोटे असून त्यांच्यापासून देशातील महिलांना सुरक्षित ठेवण्याचा या योजनेचाही उद्देश डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये योजना सुरू केली होती. या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भारत सरकार या योजनेअंतर्गत एलपीजी कनेक्शनसाठी सबसिडी देते. घरगुती सिलेंडरसाठी १६०० रुपये/पाच किलो सिलेंडरसाठी ११५० रुपये दिले जातात. याशिवाय ऑइल मार्केटिंग कंपनीज (OMCs) द्वारे योजनेच्या लाभार्थ्यांना बिनव्याजी कर्जाची सुविधा देखील दिली जाते.