निपाणी : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न विषयी दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांकडून वेगवेगळी विधानं केली जात होती. त्यातच भर पडली ती म्हणजे बेळगाव आगारातील काही चालकांनी कोल्हापूरला जाणाऱ्या बसेस निपाणीतून मागे हाकलल्या.
महाराष्ट्रात कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या (Karnataka State Transport Corporation) बसेस वर जय महाराष्ट्र असे लिहून काळे फासल्याने कर्नाटक-महाराष्ट्र बसेस (Karnataka-Maharashtra Border Dispute) शुक्रवारी दुपारी बंद झाल्या. विविध आगाराच्या लांब पल्याच्या बसेस निपाणी व कोल्हापूर येथे थांबवून ठेवल्या आहेत. त्याचा परिणाम दोन्ही राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेवर झाला.
शुक्रवारी (ता. 25) सकाळपासून दोन्ही राज्यातील बससेवा सुरळीत सुरु होती. मात्र, कोल्हापूर येथे कर्नाटकच्या बसेस अडवून ठेवल्याने महाराष्ट्र बसेसही कर्नाटकात येण्यास मज्जाव केल्याने दोन्ही राज्यातील बससेवा दुपारी 12 नंतर विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांसह मजूर, कामगार, विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. बेळगाव, धारवाड, हुबळी, हावेरी, राणेबेण्णूर, रायचूर या आगारांच्या निपाणी, पुणे, मुंबई, सातारा, औरंगाबाद, नाशिक येथे जाणाऱ्या बसेस कोल्हापूर मार्गावरून बाहेरून सुरु ठेवल्या होत्या. अनेक चालक व वाहकांनी धोका पत्करण्यापेक्षा आपल्या बसेस निपाणी बस स्थानकातच थांबून ठेवल्या.
बेळगाव आगारातील काही चालकांनी कोल्हापूरला जाणाऱ्या बसेस निपाणीतून मागे हाकलल्या. दुपारनंतर बससेवा सुरळीत सुरु होण्याचे संकेत दिसत होते. मात्र, तीन वाजेपर्यंत केवळ बाहेरून बससेवा सुरु होती. महाराष्ट्र बसेसही (Maharashtra Bus) बंद केल्याने दोन्ही आगारांचा जास्त महसूल बुडाला तसेच प्रवाशांना खासगी वाहनांचा आर्थिक भुर्दंड ही बसला. दगडफेकीच्या भीतीने खासगी वाहनधारकही महाराष्ट्रात जाण्यास धजावत नव्हते. त्यामुळे निपाणी बसस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली होती. बससेवा बंद असल्याचे समजताच प्रवाशीही बुचळक्यात पडलेत. निपाणी आगाराच्या बसेस स्थानकात आल्यानंतर चालकांना त्या थांबविण्याच्या सूचना अधिकारी करत होते. तसेच बसमधून प्रवाशांना उतरले जात होते.
वातावरण तणावपूर्ण झाल्याने व कर्नाटकच्या बसेस कोल्हापुरात अडविल्याने बससेवा बंद करावी लागली. धोका टाळण्यासाठी लांब पल्ल्याच्या बसेस महामार्गावरून बाहेरून सुरु ठेवल्या आहेत. वातावरण शांत झाल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व मार्गावरील बससेवा सुरळीत केली जाईल. अशी माहिती चिक्कोडी तालुक्यातील विभागीय
नियंत्रणाधिकारी व्ही. एम. शशीधर यांनी दिली.