रायगड : मुंबईसह राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला आहे. दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांची दिनचर्या बदलली आहे. बुधवारी रात्री खालापूरजवळील इरसालगड (इरसाल वाडी) येथे दरड कोसळून अनेक कुटुंब मलब्याखाली अडकून मृत्यूमुखी पडल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
या गावात फक्त 50 ते 60 घरांची वस्ती असून 200 ते 300 च्या आसपास मतदार असल्याचे समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार मलब्याखाली अंदाजे 30 ते 40 घरातील लोक अडकले आहेत. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 60 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. अनेकांना वाचवण्यात यश आले आहे. बचावकार्य अद्यापही सुरु आहे. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील घरांजवळ ही घटना घडली.
इरसालवाडीमध्ये माळीण आणि तळीयेची पुनरावृत्ती झाली असं म्हणण्यात येत आहे. रायगडमधील तळीये आणि माळीण गावावर दरड कोसळून अनेकांचा मृत्यू झाला होता. तळीये गावातील 35 घरांवर दरड कोसळली होती, यामध्ये 44 जणांचा मृत्यू झाला होता. तर माळीणमध्ये 151 जणांनी आपले प्राण गमावले होते. सकाळी माळीण गावावर दरड कोसळली आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली मूळ माळीण गावातील 74 पैकी 44 घरे दबली गेली. जवळजवळ संपूर्ण गाव क्षणार्धात गायब झाले. यामध्ये 151 जणांचा प्राण गेला होता. याच दुर्घटनेची पुनरावृत्ती पुन्हा एकदा झाली आहे. इरशाळगडमधील तीस पेक्षा जास्त घरावर दरड कोसळली आहे. मलब्याखाली आणखी 40 ते 45 मृतदेह अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.
इरशाळगड गावावर दरड कोसळल्याची माहिती मिळताच मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे आणि महेश बालदी यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तात्काळ इरशाळगड येथील दुर्देवी घटनेचा आढावा घेतला असून त्यांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज घटनास्थळाला जाण्याची शक्यता आहे.
मात्र, सततची संततधार आणि अजूनही डोंगरावरची माती खाली सरकत असल्याने बचावकार्यात अडथळा येतो आहे.