मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून (Andheri East By Election) भाजपने ( BJP ) अखेर माघार घेतली आहे.
त्यामुळे ऋतुजा लटके (Rutuja Latake) यांचा विजय निश्चित मानला जातोय, चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची माहिती दिली. मुरजी पटेल हे भाजपचे उमेदवार यांनी आता आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे, असंही बानवकुळे यांनी स्पष्ट केलं.
2019च्या निवडणुकीत मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांनी भाजपमधून बंडखोरी केली होती. 2019च्या निवडणुकीत मुरजी पटेल हे दुसऱ्या स्थानी राहिले होते. त्यानंतर आता भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती.
मात्र आता पुन्हा त्यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश पक्ष श्रेष्ठींकडून देण्यात आल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय. ते पक्षाच्या आदेशाचे पालन करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
शिवसेना आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्यानंतर अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली होती. ही निवडणूक शिंदेच्या बंडखोरीनंतर प्रतिष्ठेची बाब बनली होती. मात्र आता भाजपने या निवडणुकीतून माघार घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे आमदार रमेश लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटके यांची बिनविरोध निवड होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी, या दृष्टीने आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. रविवारी रात्रीनंतर भाजप नेत्यांच्या आज सकाळीही महत्त्वपूर्ण बैठका पार पडल्या होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर शरद पवार यांनीही तेच आवाहन केलं होतं. दरम्यान, अखेर ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालंय.
बिनविरोध निवड होणार हे जवळपास स्पष्ट झाल्यानंतर ऋतुजी लटके यांनी सर्व राजकीय नेत्यांचे आभार मानलेत. सर्व कार्यकर्त्यांची आणि माझीही ही ईच्छा होती, की ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असं त्या म्हणाल्यात. दरम्यान, राज ठाकरे, शरद पवार यांच्यासह प्रताप सरनाईक यांनी केलेल्या विनंतीबाबतही ऋतुजा लटके यांनी आभार मानले. – नंदिनी जी. पंचायत स्वराज समाचार.